aappansare.in

Social

भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे शिल्पकार : डॉ. मनमोहन सिंह

Share

भारताच्या इतिहासातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व, ज्यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून कारकीर्द गाजवली. इतकेच नव्हे तर 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतांना त्यांच्या मंत्रीमंडळात त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला तारलं. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताची बाजारपेठ संपूर्ण विश्वाकरिता खुली केली. यामुळे जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबून देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात त्यांना यश लाभलं.  वर्ष 2004 मध्ये ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत प्राप्त केलं होते.,  त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले.  नंतर 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे सर्वत्र मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे आपल्या भारत देश तारला गेला. त्यानंतर 2009 मध्ये डॉ. मनमोहन सिंग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणणारे आणि प्रामाणिक नेतृत्वाचे प्रतीक म्हणून डॉ. मनमोहन सिंह यांना ओळखले जाते. त्यांचे जीवन आणि कार्य भारतीय जनतेसाठी प्रेरणादायी आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाब प्रांतातील (आताच्या पाकिस्तानातील) गाह गावात एका साधारण कुटुंबात झाला. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. अत्यंत हुशार आणि अभ्यासू स्वभावाच्या मनमोहन सिंग यांनी शालेय शिक्षणात प्रावीण्य मिळवले. त्यांनी चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील डॉक्टरेट प्राप्त केली. त्यांचे शैक्षणिक जीवन उत्कृष्ट यश आणि सन्मानांनी भरलेले होते.

डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द मुख्यतः आर्थिक धोरणांशी निगडित होती. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1991 साली, भारत गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात असताना, पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सिंह यांची केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी त्या काळात उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या त्रिसूत्रीवर आधारित आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी केली. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली. 2004 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. ते स्वतंत्र भारतातील पहिले अशा प्रकारचे पंतप्रधान होते, ज्यांनी गांधी-नेहरू परिवाराचे सदस्य नसताना काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रांत प्रगती केली. दोन टर्मसाठी पंतप्रधान राहिलेल्या डॉ. सिंह यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 2008 सालचा भारत-अमेरिका आण्विक करार हा त्यांच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. त्यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात जलद वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली.

डॉ. मनमोहन सिंह हे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थीपणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी कधीही राजकीय कुरघोड्यांमध्ये स्वतःला गुंतवले नाही. त्यांची नेतृत्वशैली शांत, विचारपूर्ण आणि परिणामकारक होती. त्यांनी आपली कार्यक्षमता आणि ज्ञानाच्या जोरावर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये आदराची जागा निर्माण केली.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात काही आव्हाने आणि टीकाही झाली. त्यांच्यावर भ्रष्टाचारावरील नियंत्रणात अपयश आल्याचा आरोप झाला, विशेषतः 2G स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा वाटप घोटाळ्याच्या संदर्भात. तथापि, त्यांच्या वैयक्तिक प्रामाणिकतेवर कधीही शंका घेतली गेली नाही.

1998 ते 2004 पर्यंत भाजप सत्तेत असताना ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 1999 मध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राहिले होते. सध्याच्या भाजप सरकारमध्ये प्रत्येक योजनेला आधार कार्डसोबत जोडण्यात आलं आहे. आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयाची ओळख बनलं आहे. पण ते आधार कार्ड काँग्रेसचे डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात सुरू करण्यात आलं होत. मनमोहन सिंहांच्या आधार संकल्पनेचं कौतुक संयुक्त राष्ट्र अर्थात यूएनने केलं होतं. डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातच ‘राईट टू एज्युकेशन’ अर्थात शिक्षणाचा अधिकाराचा कायदा हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. याअंतर्गत 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला.

डॉ. मनमोहन सिंह यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना 1987 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि आर्थिक क्षेत्रातील योगदान यासाठी त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. डॉ. मनमोहन सिंह  हे आधुनिक भारताच्या आर्थिक विकासाचे शिल्पकार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक स्थिरतेसह जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे साधेपणा, प्रामाणिकता आणि ज्ञान यामुळे ते भारतीय राजकारणातील एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून स्मरणात राहतील. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन भारताला अधिक प्रगत आणि समृद्ध बनवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up