ए. आय. नोकऱ्या घालविणारे नव्हे तर देणारे माध्यम : दीपक शिकारपूर
Share
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए. आय.) वापरामुळे बेरोजगारी वाढण्याची भीती नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून शैक्षणिक क्षेत्र, मार्केट रिसर्च, अभियांत्रिकी, माहिती संकलन, शेती आदी कार्य क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी केले. ए. आय. तंत्रज्ञानाला स्पर्धक समजू नका तर त्याचा मदतनीस म्हणून वापर करा, सजक वापरकर्ते व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘ए आय आणि संधी’ या विषयावर वाचन कट्टा या उपक्रमाअंतर्गत पुणे नगर वाचन मंदिरातर्फे शिकारपूर यांचे आज (दि. 16) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सहकार्यवाह प्रसाद जोशी, वाचक कट्टाचे प्रमुख, कार्यकारिणी सदस्य विनायक माने उपस्थित होते. पुणे नगर वाचन मंदिरात व्याख्यान झाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, असे सांगून शिकारपूर पुढे म्हणाले, आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर माहिती, संवाद आणि इमेज प्रोसेसिंग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. वापरकर्ता हाच माहितीचा वाहक असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सजगतेने होणे आवश्यक आहे. अयोग्य माहिती देणे नीतिमत्तेचे प्रश्न निर्माण करू शकते. या तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करू नये. म्हणूनच मर्यादित डिजिटल प्रेझेन्स आवश्यक आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, माहितीचा अयोग्य वापर यातून सायबर गुन्हे वाढू शकतात. म्हणूनच युवा पिढीला सायबर संस्कार देणे ही काळाची गरज आहे. सायबर सिक्युरिटीविषयी कायद्याचे मुलभूत ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितीही मोठ्या प्रमाणात झाला तरी मानवी मेंदूत असलेल्या नॉन डिजिटल अनुभवांपुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामर्थ्य नेहमीच कमी राहणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेविषयक अंधविश्वास न ठेवणे, भावनिक गुंतवणूक न करणे, सततचा वापर योग्य नसून आज डिजिटल उपासाची समाजाला गरज आहे, असेही ते म्हणाले.
दीपक शिकारपूर यांचा परिचय आणि स्वागत सहकार्यवाह प्रसाद जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन विनायक माने यांनी केले. कार्यकारिणी सदस्य राजीव मराठे यांनी आभार मानले

दीपक शिकारपूर यांचा सत्कार करताना प्रसाद जोशी.