aappansare.in

Social

आर्थिक महासत्तेच्या तिसर्‍या स्थानाकडे भारताची वाटचाल – डॉ. आनंद देशपांडे

Share

पुणे, दि. 25 – भारताकडे कल्पक उद्योजकांबरोबरच रोजगार निर्मितीची प्रचंड मोठी क्षमता आहे आणि त्यमुळेच भारताची तिसर्‍या आर्थिक महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे, ते स्थाऩ आपण लवकरच पटकावू असे प्रतिपादन पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यानी आज येथे केले. एकविरा प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या नवउद्योजकांची यशोगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पिनॅकल ग्रुपचे प्रमुख व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर, लेखक डॉ. शिकारपूर व प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी होते.

यावेळी बोलतांना डॉ. देशपांडे म्हणाले की, भारताने विविध क्षेत्रात भरघोस प्रगती केली आहे. विशेषत: औद्योगिक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रगती जागतिक स्तरावर सर्वाच वरच्या स्थानावर आहे. आज शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत, त्याचा तरुणांनी चांगला उपयोग करुन उद्योजक होण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. उद्योजकता हाच भारताच्या आर्थिक महासत्तेतला महत्वाचा पाया आहे. मेक इन इंडियाच्या मदतीने नवनवे स्टार्टअप करणारी तरुणाई हेच भारताचे बलस्थान आहे. या नवउद्योजकांच्या यशोगाथा सर्वस्तरावर पोहचवण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे.

सर्वांचे स्वागत करतांना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले की, आज माझे हे 58 वे पुस्तक प्रकाशित होत आहे. प्रामुख्याने संगणक साक्षरता, सायबर क्राईम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहचावे, हा माझा प्रयत्न आहे. आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना देखील सहज समजेल अशा मराठीतून त्यासाठीच पुस्तके लिहीण्याचा मी संकल्प केला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दशकात अनेक पहिल्या पिढीतले उद्योजक तयार झाले. नवउद्योजकांची यशोगाथा या नव्या पुस्तकात अशा 47 नवउद्योजकांचा प्रवास रेखाटला आहे. विविध क्षेत्रातील हे उद्योजक युवा पिढीतले आयकॉन्स आहेत. तरुणांना पुढील वाटचालीसाठी या पुस्तकाचा चांगला उपयोग होऊ शकेल.

डॉ. सुधीर मेहता यांनी तरुणांनी नव्या कल्पनांना मूर्त स्वरुप देत उद्योग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे. कोणत्याही वयात उद्योजक होता येते, त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या (एआय) क्षेत्रात अनेक संधी आहेत, त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे. डॉ. रवींद्र आचार्य यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे निर्माण होणार्‍या संधी आणि डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या माध्यमातून घेतले जाणारे अभ्यासक्रम याची माहिती दिली. डॉ. कुचेकर यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले तर मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

एकविरा प्रकाशनचे भालचंद्र कुलकर्णी, लेखक डॉ. दीपक शिकारपूर, पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे प्रमुख डॉ. सुधीर मेहता, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य व बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up