वॉटर कॉन्फरन्स ला चांगला प्रतिसाद
Share

वॉटर कॉन्फरन्स’ मध्ये व्यासपीठावर डावीकडून डॉ.विनिता आपटे,भरत काळे,इव्ही होच,हेमंत वाटवे,सुनील शास्त्री
पुणे:
विलो फाऊंडेशन,तेर पॉलिसी सेंटर, ग्लोबल नेचर फंड आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘ राष्ट्रीय पातळीवरील वॉटर कॉन्फरन्स’ ला मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला.विलो फाऊंडेशनच्या कार्यकारी समितीच्या सदस्य इव्ही होच, तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे,एम आय टी डब्लू पी यु चे डॉ.रत्नदीप जोशी,ओशन गव्हर्नन्स चे सुनील शास्त्री, विलो मॅथर अँड प्लॅट पंप्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक हेमंत वाटवे यांच्या उपस्थितीत कॉन्फरन्सचे उद्घाटन झाले.
दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एमआयटी कोथरूड कॅम्पसमधील चाणक्य सभागृहात सुरु झालेल्या परिषदेची दिवसभर तीन सत्रे पार पडली. देशभरातून पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते.पृथ्वी जपणारी पर्यावरण संस्कृती हवी,असा सूर या वॉटर कॉन्फरन्समध्ये उमटला.
उद्घाटन सत्रात बोलताना इवी होच म्हणाल्या,’ विविध देशात विविध संस्कृती नांदत असल्या तरी शाश्वत विकासासाठी एकच पृथ्वी आहे, आणि ती जपणारी पर्यावरण संस्कृती निर्माण झाली पाहिजे. वॉटर कॉन्फरन्स सारख्या परिषदांमधून होणारी चर्चा पृथ्वीच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल ‘.
डॉ.विनिता आपटे म्हणाल्या,’संसाधने जास्त असणाऱ्या देशांनी विकसन शील देशांना किमान पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान दिले पाहिजे. अन्यथा तिसरे युद्ध पाण्याच्या प्रश्नावरून होईल. पर्यावरण संवर्धनासाठी अनेक संस्था काम करीत आहेत. कॉर्पोरेट कंपन्या पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने पर्यावरण संवर्धन शक्य आहे’.
एमआयटीचे सह अधिष्ठाता डॉ.रत्नदीप जोशी म्हणाले,’ एमआयटी हा ग्रीन कँपस आहे.मध्ये वेस्ट मेनेजमेंट चे प्रयोग केले जातात. तंत्राद्वारे उर्जेची बचत केले जाते. केवळ शिक्षण देऊन न थांबता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो.भारतीय पारंपारिक ज्ञानाचा पर्यावरणसंबंधी समस्या सोडवणुकीसाठी उपयोग केला पाहिजे’.
एमआयटी च्या सेंटर ऑफ एक्सलन्स चे भरत काळे म्हणाले,’ सांडपाणी पुनर्वापर करण्याची नवनवीन तंत्रे येत असली तरी नागरी आणि ग्रामीण भागात पाणी दुषीत होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. औद्योगिक वापराने पाणी दूषित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे’.
ज्येष्ठ अभ्यासक सुनील शास्त्री म्हणाले,’पाणी हे अमर्याद नैसर्गिक संसाधन नाही, पाणी मर्यादित आहे, आणि ते संपणार आहे.याची जाणीव ठेवली पाहिजे.वाढती लोकसंख्या पाहता जगाच्या उपलब्ध पाणीसाठ्यापैकी भारतात फक्त ४ टक्के पाणी आहे. कृषीसाठी पाण्याचा वापर अधिक आहे.पाणी जपले नाही,तर जीवन शिल्लक राहणार नाही’.
हेमंत वाटवे म्हणाले,’शाश्वत विकास हा व्यवसायाचा गाभा असला पाहिजे. विलो फाउंडेशन यासाठी कटिबद्ध आहे. पाण्यावरती संशोधन करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे’ .
डॉ. अजय देशपांडे म्हणाले,’मी राष्ट्रीय हरित प्राधिकरण( एनजीटी) मध्ये काम करत असताना अनुभव घेतला आहे की अनेक लोकांना स्वतः चे हक्क काय आहेत याची माहिती नसते . स्वच्छ पर्यावरण हा जसा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे तसेच पर्यावरण स्वच्छ राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे’.
भरत काळे, सुनील शास्त्री, हेमंत वाटवे, आयआयटी मुंबईचे अजय देशपांडे,विनोद बोधनकर, जास्मिन आरोझ, प्रा.मुल्लर सेगॅन,डॉ. जयती शौरे, प्रा. डी.एस. भातखंडे, तनुजा खडके, नितीन असालकर यांनी मार्गदर्शन केले.स्नेहा कराडे यांनी सूत्रसंचालन केले.