aappansare.in

Uncategorized

राजांमुळे साम्राज्य किंवा स्वराज्य आहे असं नव्हे तर या स्वराज्यामुळं आपण आहोत ही भूमिका छत्रपती शिवबांची आणि त्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र संभाजी राजे यांचीही होती आणि याच भूमिकेतून भोसले घराण्यातील छत्रपतींनी मराठ्यांचं साम्राज्य वाढवल आहे. आजवरच्या कोणत्याही लढाईत आधी सैनिक मग सरसैनिक , मग त्यांची फळी आणि शेवटी राजा असतो म्हणजेच शत्रूचा पहिला घाव हा सैनिक अंगावर घेतो. परंतु छत्रपतींच्या राज्यात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोन महान योद्धे असे होते की शत्रूचा पहिला घाव ते स्वतःच्या अंगावर घेत असत .ते सर्वात पुढे असायचे आणि त्यांचे सैनिक मागे.. हे आजवर इतर कुठेही घडलेलं इतिहासाने पाहिलेलं नाही आणि म्हणूनच लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे कारण तो समुदायाला सर्व प्रकारे पोसत असतो. त्यांचा कुटुंब प्रमुखाप्रमाणे सांभाळ करत असतो आणि नेमकं हेच झालं जेव्हा मराठा साम्राज्यांचे लाडके राजे, थोरल्या महाराजांचे सुपुत्र म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची औरंग्याने अत्यंत क्रूरपणे , अमानुषपणे छळ करून हत्या केली तेंव्हा… हा धक्का शूरवीर पराक्रमी मराठी साम्राज्यासाठी फारच भयानक आघात होता. ही जखम इतकी खोल होती की आजही ती साडेतीनशे वर्षानंतरही ताजी आहे. जणू काल परवाच घडली.

Share

आज छावा सिनेमा बघताना हे प्रकर्षाने जाणवलं आजवर याबद्दल थोडाफार वाचले .पण आज जे पाहिलं त्याचा परिणाम खूपच खोलवर गेलाय. हे पाहताना खूप सारे प्रश्नही पडत होते. कारण ठराविक इतिहास वाचून आपण मोठे झालेलो आहोत. पहिला प्रश्न असा येतो की इतके पराक्रमी जर मराठी होते तर ही अशी वेळच का आली? त्याचे उत्तर म्हणजे आपल्याला मिळालेला फितुरीचा शाप.. दुसरं असं की छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याच्या सैनिकांनी पकडलं त्यानंतर 40 दिवसांनी त्यांची हत्या झालेली आहे. या चाळीस दिवसांमध्ये मावळ्यांनी त्यांच्या सुटकेसाठी काहीच प्रयत्न कसे केले नाहीत? का ते या सिनेमात दाखवले गेले नाही.

छावाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालेला आहे आणि ही बातमी औरंग्याच्या दरबारात अत्यंत आनंदाने त्याचा मुलाजिम त्याला सांगतो आहे तेव्हा क्षणासाठी औरंग्या,” ए खुदा जन्नत का दरवाजा खुला रखना सिवा आ रहा है” असं म्हणतो तेव्हा त्याचा अख्खा दरबार आणि हे बघणारा प्रेक्षकही अचंबित होऊन हे पाहत असतो परंतु दुसऱ्याच क्षणाला भिकारीओको अमीर बना दो ,उत्सव मनाव.. असं सांगायलाही औरंग्या विसरत नाही. सिवा गेला आता मराठी साम्राज्याला कोणीही वारस नाही. त्यामुळे सहजरीत्या आपण हे साम्राज्य ताब्यात घेऊ शकू. शत्रू संपला असं समजून औरंग्या थोडा हलका होतो आहे तेवढ्यात..बुऱ्हानपूर वर कोणी चाल करून येत आहे अशी बातमी येते. हे औरंग्याचे अत्यंत लाडक गाव. बाजारपेठेचे केंद्रस्थान असलेलं बुऱ्हानपूर हा औरंग्याचा एक प्रकारचा गुरुर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर मोघलांमध्ये जल्लोष चालू आहे. शत्रू गाफील आहे. नेमक्या या परिस्थितीचा फायदा घेत छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या निवडक मावळ्यांसह अचानक पणे बुऱ्हानपूर वर चाल करून येतात.. तिथला खजिना लुटतात आणि संपूर्ण बुऱ्हानपूर उध्वस्त करतात. विद्रूप करतात. या बातमीने औरंग्याला आतून जबरी धक्का बसलाय.. आजच्या भाषेत त्याचा इगो डीवचला गेलाय…तेव्हा औरंगया सिवा गया पर उसकी सोच लेके संभाजी आया एवढेच म्हणतो. मुघल साम्राज्याला म्हणजेच औरंग्याला इतक्या वाईट पद्धतीने यापूर्वी कोणीही जलील केलेलं नव्हतं.जे छत्रपती संभाजी महाराज यांनी सहज करून दाखवलं होतं. हे अपयश क्रूरकर्मा औरंग्या सहजासहजी मानणाऱ्यातला नव्हताच. इथूनच त्याच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातल्या दुश्मनीची सुरुवात होते. एक प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचा आयुष्यातला काळया कभिन्न घटनांची मालिका सुरू होते..

या घटनेनंतर औरंग्या त्याच्या पाच लाख सैनिक आणि बाकीचा फौज फाटा घेऊन दख्खन कडे चाल करून येतो.. येताना जिथे जिथे भगवा दिसेल तिथे तिथे लाल करा असे फर्मान सोडतो. रस्ता, पाडवस्ती, खेडोपाडी मुघल मराठी साम्राज्यांचे, तेथील रयतेचे हाल हाल करून सोडतात. मोघलांच्या अत्याचारांना सीमाच उरत नाही. संपूर्ण पांढरीशुभ्र नदी मराठ्यांच्या लालबुंद रक्ताने वाहते आहे असं दृश्य आपण पाहतो. उत्तरेतून निघालेला औरंग्या अशा प्रचंड फौज फाटासह प्रत्यक्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर येऊन उभा राहतो तो साधारण नऊ वर्षांचा काळ आहे. ही नऊ वर्ष औरंग्याने फक्त आणि फक्त संभा की खोज मे लगाई हैं.. वेगळ्या भाषेत बोलायचं तर मराठ्यांनी नऊ वर्ष औरंग्याला झुलवत ठेवलेला आहे.त्यांच्या विशिष्ट गनिमी काव्याने औरंग्याला हरवलेला आहे, नामोहरम केलेला आहे.. केवळ 25 हजार सैनिकांनी पाच लाखाहून जास्त असलेल्या फौज फाट्याला दिलेली ही सणसणीत चपराकचआहे.

पूर्वार्ध मधे बाजू सविस्तर पड़े मंडली जाते..परंतु छावाच उत्तरार्ध अधिक प्रभावी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका जगलेले अभिनेते विकी कौशल यांनी त्यांच्यातील सर्व अभिनय कौशल्य पणाला लावली यात शंकाच नाही. त्यांची देह बोली आणि हावभाव , अत्यंत बोलके डोळे,युद्धनीतीतील सराईत पणा खराखुरा छत्रपती असल्याचाच भास करून देतो. साक्षात छत्रपती संभाजी महाराज यांनाच आपण पाहतो आहोत असेच वाटत राहते हेच या अभिनेत्याचे निर्भळ यश आहे. दणकट राकट दिसण्यासाठी ठरवून कमावलेलं, जबरदस्तीचे पिळदार असं त्याचं शरीर दिसत नाही.. हे जास्त रियालिस्टिक ..अत्यंत धाडसी, साहसी पराक्रमी ,जबाबदार युद्धनिपुण असा हा छावा त्याने लिलया सादर केलाय. संगमेश्वर येथे मावळ्यांना उद्देशून तो जे बोलतो ते हृदयाला स्पर्शून जाते. आणि वाटतं आपलं राज्य योग्य हातात आहे. आता आपल्याला कशाची चिंता करायची गरज नाही. पण दुसऱ्या सीनला कवी कलश त्यांना औरंग्याचे सैनिक खालपर्यंत आलय याची बातमी देतो. तेव्हा औरंग्याचे पाच हजार सैनिक संगमेश्वरला वेढा घालून बसलेले असतात आणि छत्रपती संभाजी महाराज फक्त दीडशे मावळ्यांसोबत असतात. तरीही प्रचंड निकरानं, त्वेषाने एक न एक मावळा लढतो निम्म्याहून अधिक औरंग्याची फौज इथे कामी येते .मराठ्यांचा जोश वाढतो आहे छत्रपती संभाजी महाराज एकाच वेळी दहा दहा जणांनाही ऐकत नाहीत हे पाहून औरंग्याचे सैनिक संख्येने बलाढ्य असलं तरी हातबल होत आहे. आणि परिस्थिती मुघलांच्या हातून सुटते की काय अशी भीती मुघलांच्या चेहऱ्यावर आहे. तेव्हाच्या संभाजी महाराजांचा आवेश पाहून शत्रूलाही धडकी भरते आहे.. अशावेळी आपल्या आपल्यातीलच फितूर झालेल्यांच्या सल्ल्यानेच छत्रपती संभाजी महाराज यांना साखळदंडात अडकवलं जातं आणि संभा औरंग्याच्या तावडीत सापडतो.

तब्बल नऊ वर्षानंतर औरंग्याला ही जीत हासिल झाली आहे. इथून पुढे मोघलांच्या क्रूर नाट्याला बहर येतोय. मराठ्यांचा गुरुर असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्या हरप्रकारे छळतो, शरीरातील प्रत्येक अवयव वेगवेगळे करूनहीं संभाजी राजे आपला आब ,आपले पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठा, यांची शान याला जराही धक्का लागू देत नाही. हे पाहू,पाहूनच औरंग्याचे पित्त खवळते. औरंग्याचे सैनिक आतून हादरून गेलेय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या कैदी झाल्यानंतरही असलेल्या बेपाक,बेबाक इराद्यांवर मुघल सल्तनत जवळजवळ त्यांच्यावर आतून फिदा झालीय. परंतु छत्रपती संभाजी महाराज आपलं धर्म आणि हिंदुत्व याबाबत कणभरही तडजोड करत नाहीत. हे पाहून औरंग्याला अशी एखादी संतान खुदा ने मला का नाही दिली हे म्हणण्याचा मोह आवरत नाही. इतके भयानक अत्याचार करूनही शेवटी औरंग्या स्वतः कंटाळतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलण्याचा सल्ला देतो तेव्हा मुघल साम्राज्याचा शहेनशहा औरंग्या अत्यंत बालिश भासतो कारण अत्याचारांची परी सीमा भोगलेले छत्रपती संभाजी महाराज थंड पणे धर्म बदलण्याला नकार देतात.जेवढे अत्याचार जास्त तेवढे छत्रपती संभाजी महाराजांचे हिंदुत्व हे कट्टर,कडक होत गेलाय.. याही प्रसंगात कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांची उत्स्फूर्त कविता वाचन तुम्हाला हलवून सोडते.

एकूणच या सिनेमात औरंग्याला म्हणजेच अक्षय खन्नाला खूप कमी वाक्य आहेत. परंतु काहीही न बोलता अत्यंत थंडपणाने अर्ध्याहून अधिक सिनेमाला अक्षयने चार चांद लावले आहेत हे नक्की.. ठंडा करके खायेंगे ही या मुघलांची पहिल्यापासूनची खोड.. प्रसंग कितीही बाका असला तरी त्यावर पटकन व्यक्त न होता शब्दांपेक्षा कृती करूनच औरंग्याने वेळोवेळी बाजी मारलेली आपण पाहतो.. प्रतिशोधाच्या मार्गावर असताना शहेनशहा औरंग्या त्याच्या सिंहासनावर मुटकुळे करून बसलाय. शरीर जीर्ण झाले झालय पण त्याचे सर्वांवर विजय मिळवण्याचे ,संपूर्ण जगावर आपली हुकूमत चालवण्याचे क्रूर मनसुबे त्याच्या शरीराला हरवतात हे आपल्याला दिसून येतं. संभाला प्रति मिनिट हरवताना एका प्रसंगात तो थंडपणे हिरव्यागार द्राक्षांचा सेवन करतोय हे पाहून प्रेक्षकांच्या मनात मात्र संतापाची लाट येते आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं .. हमे अंगूरो से ता उम्र नफरत हो गई है भले वो कितने भी मीठे हो..

रश्मिका मंधाना बाईं उर्फ येसूबाईं चा खानदानीपणा आपलं लक्ष निश्चित वेधून घेतो.समईच्या ज्योती प्रमाणे असलेलं तिचे सदा सर्वद शांत सौंदर्य..एक प्रकारचा ठेहेराव दिसून येतो तिच्या चेहऱ्यात. स्वराज्याच्या आणि घरातल्याच गुप्त शत्रूंशी लढून आल्यानंतर छत्रपतींना आपल्या महालात याव वाटावं अशाच येसूबाई मंधाना बाईंच्यात दिसून येतात. शालिने ते बरोबरच कर्तबगार ,धीरोदात्त अशीच राणी उभी केलीय तिने.इथे राणी येसूबाई यांचे दागिने, यांच्या पैठण्या, भरजरी वस्त्रे समोर असूनही त्याकडे लक्ष जात नाही इतक्या सहज राणी येसूबाई वावरल्या आहेत. एका सीन मध्ये त्यांचा मोरपंखी पैठणीचा पदर दिसतो ही आहे पण तो त्यांच्यावर इतका खुलतोय ते पाहूनच पैठणीला राज वस्त्र का म्हटलं गेलंय याची मनोमन खात्री पटते.

सर्वात शेवटी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचे मानावे तितके आभार कमी आहेत कारण त्यांनी मुळात हा स्फोटकासारखा विषयावर सिनेमा बनवला .शिवाय इतके ज्वलंत, नाट्यमय असे आयुष्य छत्रपती संभाजी महाराज जगले ,त्यातच त्यांचा शेवट झाला हे त्यांनी जसेच्या तसे सिनेमाच्या माध्यमातून दाखवलं. आणि यामुळेच आजच्या काळातही घराघरात नव्हे मनामनात छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदुत्वासाठी केलेले बलिदान पोहोचले.. तेव्हा असे जरूर वाटतं की व्यर्थ न हो बलिदान ..व्यर्थ न हो ये छत्रपती संभाजी महाराज का बलिदान!!!🚩🚩🚩🚩🚩👏🏾👏🏾

विद्या घटवाई
9850680924

1 Comment

  1. Smita Kurve February 23, 2025

    अतिशय यथार्थ विश्लेषण. भाषा शैली जितकी ऐतिहासिक तितकीच प्रासादिक आणि प्रभावी आहे. चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो व अंगावर अक्षरशः काटे येतात आणि कट्टर हिंदुत्व नसानसात संचारते, छत्रपती शिवाजीमहाराज व संभाजी महाराज यांचा अभिमान वाटतो.

    Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up