भौतिक प्रगतीबरोबरच नैतिक प्रगती झाल्यास भारत विश्वगुरू : डॉ. मोहन भागवत
Share

डॉ. मोहन भागवत यांचा सत्कार करताना विनय कुलकर्णी
समदृष्टीचा अवलंब करणे म्हणजे विश्वगुरुत्व होय : डॉ. मोहन भागवत
सहजीवन व्याख्यानमालेत ‘विश्वगुरू भारत’ विषयावर व्याख्यान
पुणे : विश्वगुरुत्व म्हणजे लौकिकार्थाने सत्ता स्थापन करणे नसून सर्वसमावेशकतेचे धोरण अवलंबिणे आहे. जात-पात, धर्मभेद विसरून संतांच्या विचारसरणीनुसार समदृष्टीचा अवलंब करणे म्हणजे विश्वगुरुत्व होय, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संविधानानुसार प्रामाणिकपणे चालणे, चुकीच्या सवयी निपटून काढणे, स्वत:च्या घरापासूनच समाजप्रबोधनाचे श्रद्धापूर्वक आचरण करणे आणि संस्कृतीचे जतन करत पुढील पिढीसमोर आदर्श ठेवणे अपेक्षित आहे. भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास विश्वगुरू भारत ही केवळ घोषणा अथवा स्वप्न राहणार नाही तर येत्या 20 वर्षात भारत विश्वगुरूपदाला पोहोचलेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली 75 वर्षे, जगातील सर्वात मोठी सुसूत्र सामाजिक संघटना असा लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे 100व्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्य महोत्सवाकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर गुरुवारी (दि. 19) जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सहकार नगर क्र. 2 मधील फुलोरा प्ले ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानास पुणेकरांची अलोट गर्दी लोटली. सहजीवन व्याख्यानमालचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत मंचावर होते. व्याख्यानमालेचे यंदाचे 23वे वर्ष आहे.
विविधता म्हणजेच एकतेचा शृंगार आहे, असे सांगत डॉ. भागवत पुढे म्हणाले, आपली विशिष्टता सांभाळत विविधता जपणे आणि सबल होणे आजच्या काळात आवश्यक आहे. मनात-बुद्धीत असलेली स्पष्टता कृतीत आणणे आणि त्यात दांभिकता नसणे गरजचे आहे. जात-पात-धर्मभेद, अज्ञान, स्वार्थ टाकून देत सर्वांना समदृष्टीने पाहतो तोच खरा जाणकार होय. यासाठी स्वत:चे आत्मनिरिक्षण करणे, संतांकडून होणाऱ्या प्रबोधनाचा धांडोळा घेत, चुकीच्या सवयी निपटून काढत संविधानानुसार प्रामाणिकपणे चालले पाहिजे.
भारतीय प्राचीन, सनातन हिंदूराष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्त्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणत जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून आपले राष्ट्र निर्माण झाले आहे. हाच इतिहास आहे, पण तो आजच्या काळात दडवला जात आहे. हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विश्वगुरुत्वाची आवश्यकता आहे. आज विश्वाचा समतोल साधण्यासाठी महाशक्तीची नव्हे तर विश्वगुरुत्वाचीच आवश्यकता आहे. आज देश भौतिक प्रगती करीत आहे. युवा पिढीच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास विश्वाचा स्वाभाविक गुरू हा भारतच होऊ शकेल ही भविष्यवाणी नव्हे तर हा साधासोपा हिशोब आहे.
डॉ. भागवत पुढे म्हणाले, सुख-सुविधा, प्रगत तंत्रज्ञान यातून जग जवळ आले, अंतरे कमी होत गेली परंतु मनामनातील अंतर मात्र वाढत गेले. यामुळेच या सुखसुविधा असूनही मन:शांती नाही. या परिस्थितीत मानवी समाजपातळीवर विचार केल्यास प्रत्येकाच्या मनात युद्धच सुरू आहे. पर्यावरणाचा अशक्य ऱ्हास होत आहे. अन्न, जमीन, पाणी, हवा विषयुक्त होत आहे; ऋतु अनियमित झाले आहेत; जमीन अस्थिर झाली आहे, ढळायला लागली आहे. अशा परिस्थितीत जगामध्ये कुणीच सुखी होऊ शकणार नाही. प्रत्येकाचा स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे; परंतु सृष्टीला जगवायचे आहे की नाही याचा विचार आज होताना दिसत नाही. विश्वाच्या अस्तित्वाकडे पाहणारी अपुरी दृष्टी बदलून विश्वाच्या चिंतनाकडे वळलेला भारत सामर्थ्यवान ठरेल.
भोगवादी संस्कृती सोडून मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गाकडे वाट दाखविणारा आपला भारत देश कायमच संयमीत भोग भोगून सुखप्राप्त करत मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गाला जाण्याची दिशा दाखवितो. व्यक्ती समुदाय, मानवता, सृष्टी या पलिकडे जाणारे आत्मा-परमात्म्याचे तत्त्व भारतीय धर्मात सांगितलेले असल्याने भारत विश्वगुरुत्वापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल. भारतीय तत्त्वज्ञान वाणी, वचन, कर्माने जोडणारे आहे, तोडणारे नाही. दृष्टीशोधन करत शक्ती, संयम, व्यायाम यातून सबळ होऊन उग्राचार्याला विरोध करणे भारतीय संस्कृतीत सांगितलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनंतर सामाजिक पंचपरिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. ज्यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरी शिष्टाचार आणि स्वदेशी यांचा समावेश असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.
डॉ. मोहन भागवत यांचे स्वागत सहजीवन व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी केले. डॉ. भागवत यांच्या व्याख्यानासाठी खास काश्मीरहून आलेल्या राष्ट्रीय वृत्तीच्या साजिद युसुफ शाह आणि राजौरी भागातील देशातील सर्वात युवा सरपंच सामरिन खान यांचा परिचय डॉ. अनंत भागवत यांनी करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते डॉ. भागवत यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.