गौरव महाराष्ट्राचा; अस्मिता अभिजात मराठी भाषेची..!दिल्ली रंगवू मराठी रंगात : सरहद, पुणेतर्फे 98 कार्यक्रमांच्या सांगता उपक्रमाचा दिमाखदार सोहळामराठी साहित्य संमेलनाची मराठी दिल्लीकरांना आतुरता : माधुरी मिसाळ
Share
पुणे : संत-महापुरुषांच्या विचारांचा जागर, साहित्यिकांची ओळख, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दाखविणाऱ्या गोंधळ, जागर, भारूड, ओव्या, उखाणे, लावणी अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणातून दिल्ली रंगवू मराठी रंगात हा दिमाखदार सोहळा रंगला. या वेळी प्रसारित करण्यात आलेल्या हे मराठी बाहु झुंजत राहु आणि आम्ही असू अभिजात या संमेलनगीतांनी सभागृहात चैतन्य पसरले.
निमित्त होते सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या 98 कार्यक्रमांच्या सांगता सोहळ्याचे. हा दिमाखदार सोहळा आज (दि. 8) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता. सरहद संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी यात उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमात अभिजात मराठी भाषेचे रंग भरले.
नगरविकास तसेच वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज अहार, डॉ. अमोल देवळेकर, संजय सोनवणी, डॉ. सतिश देसाई, मनिषा वाडेकर, झाहिद भट, काश्मीरी संगीतकार किशन लांगु, महेश वाबळे, उद्धव धुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले.
सुरुवातीस शारदास्तवन झाल्यानंतर सरहद शाळेतील शिक्षिकांनी महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या साहित्यप्रेमींच्या गप्पांमधून बारा कोसावर बदलत जाणाऱ्या मराठी भाषेचा डौल दर्शविला. गाणी, कविता, उखाणे याद्वारे आपआपल्या प्रांतातील साहित्य-संस्कृतीची ओळख करून दिली.
शिक्षणाची महती सांगणारा मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. संत, साहित्यिकांच्या वेषात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण सादरीकरणातून मराठी भाषेची गोडी दर्शविली. विद्यार्थी-विद्यार्थिनींचे काव्य वाचन लक्ष्यवेधी ठरले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे बलिदान आणि आजच्या काळातील तरुणाईचा परदेशाकडे असलेला ओढा याविषयी मार्मिक टिप्पणी करणाऱ्या मी भारतीय या प्रयोगाने रसिकांची दाद मिळविली.
साहित्याचा जागर-गोंधळ, आठवणीतल्या शांता शेळके, विद्यार्थी कवीकट्टा, एकपात्री सादरीकरण, स्त्री सक्षमीकरणाची ओवी यासह विविध नृत्याविष्कार या प्रसंगी सादर झाले. काश्मीरी गायिका शमीमा अख्तर यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, माझे माहेर पंढरी ही गीते ऐकवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मणिपुरी, आसामी नृत्यासह काश्मीर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मिलाफ घडविणाऱ्या नृत्य सादरीकरणाने एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता गौरव महाराष्ट्राचा या सादरीकरणाने झाली.
संमेलन गीतांचे अनावरण माधुरी मिसाळ, पराग काळकर आणि मान्यवरांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.
संमेलनाविषयी दिल्लीकर मराठी भाषकांमध्ये प्रचंड आतुरता : माधुरी मिसाळ
या वेळी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या, मराठी भाषा मूलत:च समृद्ध आहे. मराठी भाषेतील साहित्य, नाट्य, परंपरा जतन करण्यासाठी काम केले गेले पाहिजे. महिलांनी आपल्यातील आंतरिक शक्ती जागृत करून उराशी स्वाभिमान बाळगावा. तसेच तो पुढच्या पिढीतही रुजवावा. दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त दिल्लीतील मराठी भाषकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून मराठी दिल्लीकर संमेलनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.
पराग काळकर म्हणाले, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्तम वातावरण निर्मिती या कार्यक्रमाद्वारे झाली आहे. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जामुळे प्रत्येक मराठी नागरिकाची जबाबदारी वाढली आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विसर पडलेल्या मराठी संस्कृतीचे पुनर्भरण होत आहे.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, शिक्षण आणि आरोग्य समाजाची सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करण्याचा मानस आहे. दिल्लीच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आभार डॉ. शैलेश पगारिया यांनी मानले.

: मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणारे सादरीकरण.

नृत्याविष्कार सादर करताना विद्यार्थिनी.

: गौरव महाराष्ट्राचा, अस्मिता मराठी भाषेची.