कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सजगतेने व्हावाजितो पुणे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी मार्गदर्शन सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
Share
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आजच्या काळात अनिवार्य आहे. व्यवसाय-उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज नाही. या तंत्रज्ञानाच्या उपयुक्तता व मर्यादा ओळखून विविध क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे या प्रणालीचा वापर होऊ शकतो, असे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी सांगितले.
जितो पुणेचा युथ विंग तसेच एम. आय. टी. वर्ल्ड पिस युनिर्व्हसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अनलॉक एआय : टूल्स ऑफ द फ्युचर या विषयावर एम. आय. टी. वर्ल्ड पिस युनिर्व्हसिटीच्या सभागृहात मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात एस. ओ. सी. एस. ई.चे डीन डॉ. मंगेश बेडेकर, डीसीईटीचे प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ. बालाजी पाटील, प्रा. निखिल सोनीमिंडे, प्रा. डॉ. रंजना अग्रवाल, प्रा. प्रसाद पूर्णये यांचा सहभाग होता.
एमआयटी वर्ल्ड पिस युनिर्व्हसिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राहुल कराड, जितो ॲपेक्सचे प्रेसिडेंट विजय भंडारी, जितो पुणेचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, जितो पुणेचे चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, जितो युथविंगचे चेअरमन गौरव बाठिया, जितो युथविंगचे चिफ सेक्रेटरी सुयोग बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. राहुल कराड म्हणाले, संपूर्ण जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान झपाट्याने बदलते आहे. हे तंत्रज्ञान जगावर राज्य करू पाहते आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी एआय शिकण्यासाठी दाखविलेला उत्साह आनंददायक आहे. जितोच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये कार्य केले जाते ते स्पृहणीय आहे.
संवाद, शैक्षणिक क्षेत्र, नियोजन, करिअरमधील प्रगती, विश्लेषण, प्रतिमा तयार करणे आदी क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. एआय टुल्सचा प्रभावीपणे वापर करताना कुठल्या विषयाची माहिती हवी आहे याच्या मुद्देसुद सूचना देणे अत्यंत आवश्यक असते. क्लिष्ट विषयाबद्दल माहिती घेताना ते सोपे, सुटसुटीत करून विविध टप्प्यांमध्ये सूचना केल्यास मिळणारी माहिती अधिक सुयोग्य व सुस्पष्ट मिळते.
इमेज जनरेटर जिपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांपैकी सर्वात लोकप्रिय व प्रगत साधन आहे. जे मजकुराच्या वर्णनावरून सुयोग्य प्रतिमा तयार करते. परंतु या प्रणालीचा सावधपणे वापर करणे आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सायबर सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. यात नेटवर्क सिक्युरिटी, ॲप्लिकेशन सिक्युरिटी तसेच मालवेअर प्रोटेक्शन जरुरीचे आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान वापरताना योग्य ती काळजी घेतल्यास सायबर ॲटॅक्सपासून बचाव होऊ शकतो.
जय नहार, स्वराज पगारिया, साहिल नहार, हार्दिक लुणावत, प्रणिता ओसवाल, यश नवलखा, रोहन शिंगवी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले. जितो, पुणेच्या युथविंगने आयोजित केलेल्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.